शासनपातळीवर बैठकीत अनेक सकारात्मक निर्णय
नाशिक ,दि.०७ (द नरिमन पॉईंट )केंद्र शासनाने कांदा खरेदीचे निकष शिथिल करण्याबरोबरच नाफेड आणि एनसीसीएफला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.त्यामुळे सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधून स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा हमीभावाने खरेदी करावा असा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार असून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाफेड आणि एनसीसीएफकडून बाजार समित्यांमध्ये सरकारी कांदा खरेदी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व्हीसी द्वारे तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी ,कृषी उत्पन्न बाजार समितींचे सभापती, सचिव प्रतिनिधी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते. सदर बैठकीत कांदा प्रश्नावर सविस्तर चर्चेअंती झालेल्या निर्णयानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार असून कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर निश्चित करण्यात आला अशी माहिती देखील मिळाली आहे . तसेच शासनाकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे लक्ष्य दिले देण्यात आलेले असून १ जूनपर्यंत केवळ १५.५० किंटल कांदा खरेदी झाला आहे . त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत निर्धारित लक्ष्य पूर्ण करावे, असे देखील यावेळी सांगण्यात आले .पणन विभागाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या बाजार शुल्कातून सूट दिली आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांनी कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून करावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत .तसेच यापूर्वी ए ग्रेड कांद्याबाबत मर्यादा होती, मात्र आता इतर दर्जाचा कांदाही खरेदी करण्यात येणार असून केंद्र शासनाने ‘अ’ श्रेणीच्या कांद्याच्या निकषात शिथिलता दिली आहे .तसेच खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना ७२ तासांत द्यावेत ,सर्व बाजार समित्यांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नव्या निकषानुसार आता ४५ मिमी आकाराचा कांदाही खरेदी केला जाईल. तसेच एक आवरण निघालेला, ३० टक्क्यांपर्यंत काजळी असलेला, ४० टक्क्यांपर्यंत डाग किंवा रंगबदल संच १० टक्क्यांपर्यंत उन्हाचा चटका लागलेला कांदाही स्वीकारला जाणार असल्याचे समजते .तरीही शेतकऱ्यांनी याबाबत अधिकृत माहितीची पडताळणी करणेचे गरजेचे आहे .एकंदरीत या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे .

