मुंबई ,दि.११ (द नरिमन पॉईंट )केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूचा रुग्ण सापडल्याने त्याच्या संपर्कातील लोकांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले असून त्यानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे .दरम्यान कोझिकोडचा रहिवासी असलेल्या ४३ वर्षाचा रुग्ण गंभीर असून तो सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती देण्यात आली आहे .
याबाबत वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी कि ,यापूर्वी २०२४ मध्ये निपाहचे दोन रुग्ण अखेरच्या वेळी सापडले होते ,पैकी एकाचा मृत्यू झाला होता .कोझिकोडचा रहिवासी असलेल्या या ४३ वर्षीय रुग्णाला सुरुवातीला हलका ताप आल्याने खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले ,परंतु त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला तातडीने कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून तो व्हेंटिलेटरवर आहे.दरम्यान सदर बाब सरकारने गांभीर्याने घेतली असून आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांनी सांगितले कि सदर रुग्ण अनेक लोकांच्या संपर्कात आलेला आहे त्यामुळे तातडीने रुग्णालयातील कर्मचारी आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वाना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या घाबरण्याची गरज नसली तरी २०१८ पासून केरळमध्ये निपाह विषाणूचा सहाव्यांदा संसर्ग पसरला आहे.त्यामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे .बहुतेकदा हा विषाणू वटवाघूळ आणि डुकरांमुळे पसरतो.या विषाणूची लक्षणे सुरवातीला दोन ते तीन दिवसांत दिसू लागतात. त्यात लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होतो .अशी माहिती देण्यात आली आहे .
निपाह विषाणूचा रुग्ण सापडल्याने केरळमध्ये हाय अलर्ट जारी !
